Thursday 27 June 2019

आता क्रिकेटचे भगवेकरण

इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळायला गेलेल्या आणि सर्व भारतीयांच्या शुभेच्छा असलेल्या भारतीय संघाला आता नविनच वादाने घेरलय. आजवर प्रचलित असलेल्या निळ्या रंगाच्या जर्सीचा रंग चक्क भगवा होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाने रंगाची चॉईस दिलेली असताना भारतीय क्रिकेट संघाला भगव्या रंगातच रंगविण्याचा अट्टाहास हा टीम इंडियाचे म्हणजेच क्रिकेटचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात असेल तर तो अयोग्य तरी कसा म्हणता येणार? केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी  सरकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ’भगवा’ अजेंडा राबविण्यास सुरुवात तर केली नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने पडू लागला आहे.
भारतीय क्रिकेट संघाची ओळखच ’मेन इन ब्लू’अशी आहे. याचं कारण म्हणजे टीमची निळ्या रंगाची जर्सी. निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमधल्या जर्सी घालूनच आतापर्यंत भारतीय संघ मैदानावर उतरला आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मात्र हे चित्र बदलू शकतं. वर्ल्ड कपमधील काही सामन्यात टीम इंडिया नारंगी रंगाच्या जर्सीमध्ये खेळू शकते. भारतीय संघासाठीच्या पर्यायी जर्सीचं रंगरूप प्रदर्शित झालं आणि एका नवीनच वादाला तोंड फुटलं. जर्सीच्या रंगाच्या माध्यमातून आता टीम इंडियाचंही भगवीकरण होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला भगव्या रंगात रंगविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातोय.
या देशाचा झेंडा तयार करणारी व्यक्ती ही मुसलमान होती. तुम्हाला जर टीमला कोणता रंग द्यायचा असेल देशाच्या झेंड्याचा द्या. ते आम्ही समजून घेऊ. पण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही भगव्या रंगात रंगवत असाल तर ते चूक आहे. लोकांनी या गोष्टीचा विरोध करायला हवा, असं म्हटलं जातय. भाजप समर्थक हा आरोप फेटाळून लावतात. भगवा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा आहे, हा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे, असे उदाहरण दिले जात टीमचा ड्रेस हा राजकीय विषय नाही आणि संघानं वर्ल्ड कप जिंकावा हीच इच्छा आहे, असं काही  क्रिकेटप्रेमी म्हणत असले तरी जर्सीवरून सुरू झालेला वाद शमला नाहीये. सोशल मीडियावरही जर्सीवरून क्रिकेटप्रेमींमध्येच उलटसुलट चर्चा रंगली आहे. अनेकांनी टीम इंडिया जिंकणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, जर्सीच्या रंगावरून काही फरक पडत नाही असं ट्वीट करून या वादात काही अर्थ नसल्याचं स्पष्ट केलं.
टीम इंडियाची ही जर्सी भारताच्याच ढ-20 टीमच्या जर्सीवरूनच तयार करण्यात आली आहे, असं म्हटलं. पण केवळ मोदी सत्तेत आल्यानंतरच भगवा रंंग देण्यात आल्याने त्यावरून वाद सुरू होणे स्वाभाविक आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध होणार्‍या सामन्यात नवीन जर्सी घालेल, असे दिसतेय. कोणी काय  घालणार आहोत, हे महत्त्वाचं नाहीये. लक्ष मॅचवर केंद्रित केलं आहे पण वुई ब्लीड ब्लू. निळा रंग नेहमीच उठून दिसेल, असे क्रिकेट खेळाडूूूूच बोलूूू लागलेत.आयसीसीने स्पष्ट केलेेेय की बीसीसीआयला रंगांचे पर्याय देण्यात आले होते आणि त्यांच्यादृष्टीने रंगसंगती त्यांनी निवडली आहे.
प्रश्न हाच आहे की जर आयसीसीने रंगाची चॉईस दिलेली होती तर भगवा रंगच निवडण्याचे कारण काय? सरळ आहे, भगव्या रंगाचही राजकारण ज्यांना करायचे आहे आणि ज्यांना आपला राजकीय मेसेज द्यायचा आहे त्यांनी जाणीवपूर्वक भगवा रंग निवडला आहे, हे कोणालाही दिसून येईल. भगव्या रंगाचे राजकारण करण्यामागे आपला अजेंडा दामटविण्याचा प्रकार आहे. सत्तेत आल्यानंतर सत्तेचा उपयोग लोकहिताचे प्रश्न सोडविण्याऐवजी धार्मिक भावना चेतविण्याचा प्रकार करण्याकडेच मोदी सरकारचे लक्ष दिसतेय. यासाठी लोकांची क्रिकेट खेळाबद्दलची भावना कॅश करण्यासाठीच क्रिकेटचे भगवीकरण करण्याचा हा हेतूपुरस्सर प्रयत्न आहे.
नजीकच्या काळात हा भगवेकरण करण्याचा प्रयत्न हळूहळू जोमाने वाढणार आहे. शिक्षणातले भगवेकरण हा आता चर्चेपलिकडचा विषय झालाय. वंदे मातरम बोला, जयहिंद बोला, भारत माता की जय बोला...म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी असाल अन्यथा तुमच्यावर राष्ट्रद्रोही ठपका ठेऊन तुम्हाला कारागृहात डांबण्यात येईल. काही काळाने भगवे कपडे घाला अन्यथा पुन्हा राष्ट्रद्रोही शिक्का बसू शकतो....ही वेळ कधी येतेय याचीच आता वाट पाहूया.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...