Thursday 23 November 2017

पालक, मुलांत सुसंवाद सदा घडो!

महाराष्ट्र दिनमानमधील शल्यक्रिया

आपला ब्लॅक अँड व्हाईट आणि आताचे एलईडी सीरीजच्या पुढे गेलेले टेलिवर्तन, पेजरवर उशिराने पडणार्‍या मेसेजला कधीच मागे टाकून ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकी चेहरा बनलेले जग आताच्या पालकासाठी पाल्याला समजून घेताना मोठे आव्हान बनले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबांतही मोबाईल आणि टीव्हीमॅनिया झाला असताना तंत्रज्ञानाचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला स्वीकारावेच लागत आहेत.

बालपणीचा काळ सुखाचा, रम्य ते बालपण, बालपण दे गा देवा..हा आपल्या नकळत्या वयातील फ्लॅशबॅक डोळ्यांपुढे तरळू लागल्यावर आजची पिढी आणि आमची पिढी, हा आताच पालक आणि पूर्वीचा बालक यांच्यातील उजव्या आणि डावेपणावर चर्चा झडू लागतात. हल्लीची पिढी सुस्साट, कुणाचे ऐकत नाही, रागाचा पारा कायम चढलेला, आपल्या आयुष्याचे निर्णय झटपट घेते, आई-वडिलांना विश्वासात न घेता टोकाचा निर्णय घेण्यासही मागे-पुढे पाहत नाही, अशी तक्रारपेटी बालक ते पालक प्रवास करणार्‍या प्रत्येकांच्या घरात आहे. सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बालक असलेला आणि आता पालकत्वाची जबाबदारी सांभळणारा प्रत्येक जण आपल्या जमान्यातील संस्काराची पाटी आपल्या पाल्यापुढे कायम वाचून दाखवत आहे. खो-खो, लंगडी, हुतूतू, लपाछपी, गोट्या, भवरा, विटी-दांडू अशा मैदानी खेळांत अगदी आईचा धपाटा पडेपर्यंत मन गुंतवणारा आजचा पालक त्याचा सुवर्णकाळ जागवत आहे. वडिलांची ऑफिसातून घरी परतण्याची वेळ झाल्यावर सायंकाळी घराचा कोनाडा पकडून पुस्तकात मान खुपसणारे डोकेही आठवते. आपण काय वाचतोय, लिहितोय यापेक्षा वडिलांविषयी असलेली आदरयुक्त भीतीही त्याचा भाग होता. आजच्या नवीन पिढीशी या भीतीची तुलना होताना आपण आपल्या पाल्यासोबत कसे आणि किती हितगुज साधतो? याचे उत्तर शोधल्यास आपला ब्लॅक अँड व्हाईट आणि आताचे एलईडी सीरीजच्या पुढे गेलेले टेलिवर्तन, पेजरवर उशिराने पडणार्‍या मेसेजला कधीच मागे टाकून ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकी चेहरा बनलेले जग आताच्या पालकासाठी पाल्याला समजून घेताना मोठे आव्हान बनले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबांतही मोबाईल आणि टीव्हीमॅनिया झाला असताना तंत्रज्ञानाचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला स्वीकारावेच लागत आहेत. तरुणीने लग्नास नकार दिल्याने तरुणाची फेसबुक लाईव्ह आत्महत्या, आई-वडिलांनी लग्नासाठी नकार दिल्याने तरुणीची गळफास घेवून आत्महत्या, मोबाईल गेममुळे विद्यार्थ्याची आत्महत्या अशा काळजाचे ठोके थांबवणार्‍या घटना सातत्याने समाजमनावर आदळत आहेत. परीक्षेत नापास झाल्याने जीवनयात्रा संपवणारे विद्यार्थी, बलात्कार, विनयभंग आणि छेडछाडीसारख्या घटनांत बालगुन्हेगारांची वाढती संख्या याकडे होणारे दुर्लक्ष आणखी चिंता वाढवत आहे. मुलांच्या हौसेला मोल नाही, जे मला मिळाले नाही ते माझ्या मुला-बाळांना मिळाले पाहिजे, दुसर्‍याकडे आहे मग आपल्याकडे का नाही, हे लाड-प्रेम स्वाभाविक आहे. मात्र त्याचा अतिरेक आपल्याच पाल्यासाठी घातक ठरत आहे. एका गरीब भाजी विक्रेत्या महिलेने वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेल्या आपल्या मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवला. याबदल्यात या मुलाने शिकून-सवरून मोठे व्हावे, आपल्या आयुष्याला दिशा द्यावी, गरीबीच्या शापातून मुक्त व्हावे, अशी या माउलीची इच्छा. एकेदिवशी याच तरुण मुलाने तिच्याकडे  मोटरसायकल घेण्यासाठी हट्ट धरला. आईनेही भाजी विक्रीतून मिळणार्‍या पैशातील पै-पै जमवून या मुलाला मोटारबाईक घेवून दिली. पण, वाईट संगतीला लागलेल्या या मुलाला आई आपल्यासाठी घेत असलेल्या कष्टांचा विसर पडत गेला. रात्रभर दारू पार्ट्या झोडून मित्रांसोबत झिंगणार्‍या या एकुलत्या एक मुलाचा बाईक अपघातात मृत्यू झाल्यानंतर जिवंत असून मरणासन्न झालेली आई तिची व्यथा कुणाला सांगणार? आपल्या मुलाचे लाड पुरवताना या माउलीचे नेमेके कुठे चुकले? आई-वडिलांचा संघर्ष डोळ्यादेखत पाहणारी मुले आणि मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून न देणारे पालक अशा अनेेक गोष्टी यासाठी चर्चेला कारण ठरते. पण, पालक म्हणून फक्त मुलांना आणि नवीन पिढीला दूषणे देवून आपली जबाबदारी संपते का? चांगला माणूस घडवण्याचे काम करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कितपत समजून घेत आहेत? हैदराबादमध्ये बारावीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला बाकावर अश्लील लिहिल्याने दोन शिक्षकांनी एका खोलीत डांबून बेदम चोप दिला. इतकेच नाहीतर प्राचार्यांकडे त्याची तक्रार करून त्याचे कॉलेजातून नाव काढून टाकण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे मानसिक ताणतणावाखाली गेलेल्या विद्यार्थ्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. 14 सप्टेंबर 2017 रोजी उघड झालेल्या या घटनेमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवादावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या मुलाचे भलेही चुकले असले पण, शिक्षक किंवा पालकांनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला का? ही प्रत्येक घराघरांत लंगडी पडणारी बाजू यावर सखोल चर्चा होण्याऐवजी मानसिक विकृती आणि प्रकृतीवरच काथ्याकूट सुरू आहे. दहावीला 87 टक्केपर्यंत गुण मिळवलेल्या या मुलाने इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. कॉलेजची फी वेळेत न भरल्याने मुलांना सवार्र्ंसमोर अवमानित करणे, उशिरा आल्यास, वर्गात बोलल्यास कडक शिक्षा देणे ही अर्धशिक्षित मास्तरकी गाजवण्याचा एककलमी कार्यक्रमही या कॉलेजात असल्याचे आत्महत्याग्रस्त मुलाच्या मित्रानेच सांगितले होते. मुळात आपल्याच नाण्याची ही दुखरी बाजू तपासताना पालक, शिक्षक, आई, वडील, भाऊ , बहीण, काका, मामा म्हणून आपलाच आपल्याशी तुटक होत चालेला संवाद हाच मोठा आजघडीचा आजार मानावा. आपल्यातील बालक, पालक म्हणून घडताना मूल जन्माला घालण्यापेक्षा मुलांना समजून घेणे हेच आजच्या पिढीचे आव्हानही आपण वेळीच ओळखले पाहिजे. आजच्या नकारात्मक वातावरणात अभ्यासात प्रगती नसल्याने मुलाबाबत चिंतित असलेल्या पालकांची काळजी त्रिशनीत अरोरा या मुलाने मिटवली. त्रिशनीतने आपली आवड हेच त्याच्या यशाचे रसायन बनवताना वयाच्या 23 व्या वर्षी तो सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनला आहे. फेसबूकवर सुरू करण्यात आलेल्या ह्यूमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या एका पेजवर त्याच्या जीवनाची प्रेरणादायी स्टोरी शेअर करण्यात आली आहे. समाजमाध्यमांतील या चांगल्या, वाईट गोष्टींवरही येत्या काळात पालक आणि बालकांत सुसंवाद घडो, इतकेच.

विनोद साळवी




No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...