Thursday 2 November 2017

मुंबई-गोवा महामार्ग विकणे आहे!

दैनिक महाराष्ट्र दिनमानच्या या लेखाने तरी सरकार आणि प्रशासनाला कोकणही महाराष्ट्रात येते, याचे भान वाटावे!...
मुंबई-गोवा महामार्ग विकणे आहे!
मा. मुख्यमंत्री साहेब, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा जो काही धडाका आपल्या नेतृत्वाखाली सरकारने लावला आहे ते पाहून आम्हा कोकणवासीयांना जणू आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही गौरी-गणपती उत्सवादरम्यान महामार्गावरील प्रत्येक खड्डा न खड्डा जातीने पुढाकार घेवून बुजवल्याबद्दल त्यांच्याही धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पनवेल, पेण, वडखळ, माणगाव, इंदापूर, रायगड, रत्नागिरी ते अगदी सिंधुदुर्ग, गोव्याच्या टोकापर्यंतच्या मुंबई-गोवा महामार्गावर एकही खड्डा आणि धुळीच्या साम्राज्याने नटलेला रस्ता नसल्याने आपले मानावे तितके आभार थोडकेच आहेत. पण, आम्हा कोकणवासीयांना अशा गुळगुळीत आणि चहूबाजूंनी विस्तीर्ण असलेल्या महामार्गाची सवय नाही. त्यामुळे कृपा करून सरकारने हा महामार्ग आता विकत घ्यावा. अगदी त्याची बोली लावल्यासही आपणला नक्कीच मोठी किमत येईल. सन्मानीय मुख्यमंत्रीसाहेब या महामार्गावरून आपण किंंवा आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी कुटुंबकबिल्यासह कधी प्रवास केला नसेल तर नक्कीच करा. कोकणच्या वाटेवर आपले स्वागत आहे. या वाटेवर आपल्या वाटेत एकही खड्डा आडवा येणार नाही. धुळीने माखलेल्या रस्त्यावरून आपले वाहन पुढे सरकताना आपल्याला सर्वत्र धुरके पसरल्याचा नजारा दिसेल. अगदी हायफाय गाडीतून या मार्गावरून आपण गेल्यास आपल्याला नौकेतून प्रवास केल्याचा अवर्णनीय आनंद घेता येईल. हा चार तासांचा आपला आरामदायी प्रवास अगदी सात ते आठ तासांपर्यंत लांबल्यास आपल्याला कंबरदुखी, मानदुखी आणि अंगदुखीचा जराही त्रास जाणवणार नाही.
सन्मानीय केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी घोषणा नुकतीच केली आहे. ते कार्यसम्राट नेते आहेत याबाबत वाद नाही. पण, गडकरी साहेब आपण महामार्ग चौपदरीकरणाची इतकी घाई करू नये. पूर्णपणे खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला आपण यातून बाहेर काढण्यासाठी थोडसे प्रयत्न केले तरीही आम्हा कोकणवासीयांना हायसे वाटेल. आमचे कोकण नैसर्गिकदृष्टया संपन्न आहे इथे पाण्या-पावसाचा तोटा नाही. पण, पावसाच्या तडाख्यात पीकपाण्याची वाट लागली तरी चकार शब्द मुखातून काढायचा नाही, असा आमचा कोकणी स्थायीभाव आमची ठायी ठायी परीक्षा घेतो आहे. कुणीही यावे नी टपली मारून जावे. कोकणची माणसे साधी भोळी. आमच्या कोकणातील नेतेही त्यांच्याच विश्वात मश्गुल आहेत. माझे गाव सुधारले म्हणजे देशही सुधारला, अशी कदाचित त्यांची भावना. आमच्या कोकणातील पत्रकारांनीही मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूच्या तांडवावर आणि खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर अनेकदा सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कासवगती कारभाराचे वाभाडे काढले. इतकेच काय आंदोलनेही उभारली. पण, कोकणच्या दुरवस्थेकडे बघण्यासाठी मायबाप सरकारला व्यस्त वेळापत्रकामुळे वेळ नाही. कोकणला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महार्गाच्या माध्यमातून विकासाचा पाया आपल्या मा. मुख्यमंत्री साहेबांनी रचला. त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण नागपूरचे आहात म्हणून नागपूरविषयी दाखवलेला जिव्हाळा आणि विकासाच्या महामार्गाचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आम्ही कोकणी माणसं तशी समाधानीच. आहे त्यात भागवायचे आणि कुणाच्या ताटाकडे बघायचे नाही, हा आमचा स्थायीभाव. पण, आमच्या ताटात असलेलं तरी नीट वाढा, ही साधी अपेक्षा धरणेही आमच्यासाठी गुन्हा ठरावा का, याचे उत्तर जमल्यास मुख्यमंत्री साहेब आपण द्याल अशी अपेक्षा हा कोकणी माणूस बाळगतो. केंद्रीय मंत्री अनंत गीते, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माजी मंत्री सुनील तटकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम अशी कोकणच्या नेत्यांची फळीच्या फळी असूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची कहाणी आजही संपलेली नाही. दरवर्षी गौरी-गणपतीत महामार्गाच्या दुरवस्थेविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर तात्पुरती मलमपट्टी करायची. त्यानंतर कोकणवासीयांच्या हालाकडे आणि महामार्गाच्या बिकट वाटेकडे फिरकूनही बघायचे नाही, असा सरकारी दंडकच अनेकांनी घालून घेतला आहे की काय, अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
अरुंद महामार्ग, खड्डेमय आणि धुळीच्या रेषा हवेत काढणे हा कोकणच्या पर्यटन विकासाचा महामार्ग येत्या काळात तर कूस बदलेल, ही भाबडी आशाही आमच्या कोकणी माणसाने आता सोडून दिली असावी. अपघाताचे केंद्र आणि मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर दररोज घडणार्‍या अपघातांत कीड्या-मुंग्यांप्रमाणे माणसे मरत असल्याचे दु:ख करण्यापलीकडे कोकणवासीयांना आता पर्याय राहिलेला नाही. तूर्त राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे मा. मुख्यमंत्री साहेब आता तरी कोकणी माणसाच्या या पत्रप्रपंचाची दखल घेतील, अशी अपेक्षा बाळगू या!
...........................................................
पनवेल, पेण, वडखळ, माणगाव, इंदापूर, रायगड, रत्नागिरी ते अगदी सिंधुदुर्ग, गोव्याच्या टोकापर्यंतच्या मुंबई-गोवा महामार्गावर एकही खड्डा आणि धुळीच्या साम्राज्याने नटलेला रस्ता नसल्याने मायबाप सरकारचे मानावे तितके आभार थोडकेच आहेत. पण, आम्हा कोकणवासीयांना अशा गुळगुळीत आणि चहूबाजूंनी विस्तीर्ण असलेल्या महामार्गाची सवय नाही. त्यामुळे कृपा करून सरकारने हा महामार्ग आता विकत घ्यावा.
................................................
................................................
विनोद साळवी, दैनिक महाराष्ट्र दिनमान

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...