Wednesday 8 November 2017

अग्रलेख... प्रदूषणपर्व आणि मुंबईकर/ महाराष्ट्र दिनमान

प्रदूषणपर्व आणि मुंबईकर
आपल्या महाराष्ट्रात औद्योगिकरण, लोकसंख्या आणि दिवसागणिक वाढणार्‍या वाहनांच्या गर्दीमुळे देशातील शहराशहरांत प्रदूषणपर्व सुरू झाले आहे. प्रदूषणाच्या क्रमवारीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. येत्या काळात आपली मुंबई अव्वल स्थान गाठण्यातही मागे राहणार नाही, ही चिंता वाहण्यासाठीही आपल्याकडे वेळ नाही. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीत महाराष्ट्रातील 17 शहरांत सर्वाधिक प्रदूषणाचा धूर कोंडमारा करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देशातील 123 शहरांत याच प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्यमान धोक्यात आले आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे प्रदूषणाने सर्वाधिक ग्रासली आहेत. इथे श्वास घेण्यासाठी फुरसत नसलेल्या मुंबईकरांना सकाळी पडणारे पिवळे धुरकेही धुक्यासारखेच भासत आहे. मुंबईत एन्ट्री करतानाच लागणारं चेंबूर हे एकेकाळी गावठाणासारखं गर्द हिरव्या झाडीने वेढलेलं होत. बघता बघता येथे इमारतीचं रान उभ राहिलं आणि आर. सी. एफ, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम अशा कारखान्यांतून निघणारा विषारी धूर येथे रहिवास करणार्‍या नागरिकांच्या आयुष्याची डेडलाईन ठरवू लागला. मासेमारीसाठी कधीकाळी प्रसिद्ध असलेल्या चेंबूर, माहुल गाव येथील खाडीतील मत्सजीव आणि जलपर्णींनाही याच प्रदूषणाच्या गंगेने बाधित केले. इथल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावरही गदा आणली. स्थानिकांनी या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवला असला तरी कारखान्यांच्या घरघरीत हा आवाज सरकारच्या कानांपर्यंत पोहोचूनही न पोहोचल्यासारखा. या कंपन्यांमुळे अनेकांच्या हातांना रोजगार मिळाला हे खरे असले तरी येथे राहणार्‍या सजीव सृष्टीला त्याची प्रचंड बाधा पोहोचली आणि यापुढेही तिच्या झळा बसत राहील, हा स्वअनुभव येथील नागरिकांनी अनेकदा माध्यमांसमोर येवून प्रकट केला आहे. प्रदूषणामुळे बळावणारे श्वसन आणि त्वचेचे विकार, अकाली पडणारे टक्कल. जन्माला आलेल्या मुलापासून ते अगदी थोरा-मोठ्यांच्या जगण्याची ठरलेली मर्यादा यावरही पर्यावरणस्नेहींनी चिंता वाहिली आहे. या मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली, तुर्भे, म्हापे गावांत ऐकेकाळी हरितक्रांतीचा सुगंध दरवळायचा. पण, आता या परिसरानेही औद्योगिकरणाचा साज चढवला आहे. येथे गगनाशी स्पर्धा करणार्‍या इमारतींचे रानही उभे राहिले. मुंबईसोबत स्पर्धा करणारे दुसरे शहर उभे राहिले. सर्व सोयीसुविधांनीयुक्त या शहरात मानवी वसाहतीही वाढल्या. पण, पहाटेच्या पाराला येणारा झाडा, पाना, फुलांचा सुंगध येथून कायमचाच नाहीसा झाला. निळ्याभोर आकाशाला प्रदूषणाच्या पिवळ्याशार धुक्यांचीही आता सवयच जडली आहे. मुंबईला लागून असलेल्या डोंबिवली शहराचा या याच प्रदूषणाने कोंडमारा चालवला आहे. कारखान्यात होणार्‍या स्फोटाने अनेकांचा बळी घेतल्यानंतरही या ओल्या जखमांवर मलमट्टी करून इथला माणूस कसेबसे आयुष्य ढकलतो आहे. तडे गेलेल्या घराच्या भिंती, भांड्याकुंड्यांपासून, प्रत्येक चीजवस्तूंवर बसणारा प्रदूषणाचा राब कितीही झटकला तरीही गोचिडासारखा पाठ सोडायला तयार नाही. 2022 पर्यंत आपले महाराष्ट्र प्रदूषणमुक्त होईल, असा दावा पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केला आहे. त्यांची ही सुर्वाता खरी ठरो, असे प्रदूषणामुळे कोंडमारा झालेल्या प्रत्येक नागरिकाची प्रार्थना आहे. थेट निसर्गाला आव्हान देत पिवळा पाऊ स पाडण्यापर्यंत गेलेला माणूस आता माणसाच्याच जिवावर उठला आहे. 2017च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सर्वप्रकारच्या वाहनांची संख्या 2.93 कोटींपर्यंत नोंदवण्यात आली आहे. तर 2014-15च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्यात 28,601 औद्योगिक युनिट्सची स्थापना झाली आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला हातभार लावून प्रत्येक घराघरांत ऑक्सिजन कीट घेण्याची तजवीज करण्याची गरज येत्या काळात भासली तर नवल वाटून घ्यायल नको. हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्याची गरजही आपल्याला भासणार नाही, हे देखील तितकेच कटू सत्य. देशभरातील दिल्ली, पाटणा, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, फिरोजाबाद, कानपूर, लुधियाना या प्रदूषित शहरांसोबत आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राने कधीच स्पर्धा सुरू केली आहे. देशातील प्रदूषित शहरांच्या यादीत आपल्या मुंबईने तिसरा क्रमांक पटकावून आपल्याकडेही प्रदूषणपर्व सुरू झाल्याची वर्दी याआधीच दिली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे आणि इतर शहरांवर निर्माण झालेले हे चिंतेचे विविधरंगी ढग‘सफर’या हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोजणार्‍या संस्थेमुळे आणखी दाटून आले आहेत. ते दूर करून आताच्या आणि भावी पिढ्यांचे आरोग्यमान् कसे राखणार, हे आव्हान माणसानेच माणसापुढे उभे केले आहे.

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...