Thursday, 16 November 2017

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 05

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 05

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 06

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 06

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 07

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 07

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 08

Maharashtra Dinman Epaper 16 Nov 2017 Page 08

मंत्रालयात नाराजी! सरकारच्या कामगिरीवर अधिकारी नाखूश

मंत्रालयात नाराजी!
सरकारच्या कामगिरीवर अधिकारी नाखूश

मुंबई (शैलेंद्र शिर्के)
मी लाभार्थी.. म्हणत सरकारच्या तीन वर्षांतील कामगिरीची जाहिरातबाजी सुरू असली तरी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग मात्र भाजपा-शिवसेना सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. प्रत्येक खात्याच्या कामगिरीचा अहवाल देण्याचे खातेनिहाय आदेश बुधवारीच सरकारने जाहीर केले असले तरी, कामगिरीच नाही तर सांगायचे तरी काय, असा हताश सवाल खासगीत अधिकारीवर्ग विचारत आहे.
मंत्रालयातील खात्यांमध्ये डोकावून कानोसा घेतला असता सरकारच्या कामगिरीबद्दल संमिश्र मतप्रवाह आढळतो. या सरकारने अपेक्षापूर्ती केली नाही असा बहुतांश सर्वसामान्यांमध्ये रोष असताना, मंत्रालयातून सरकारची आणि प्रशासकीय यंत्रणेची सूत्रे हाकणाऱ्या कर्मचारीवर्गानेही कमीअधिक प्रमाणात हाच अपेक्षाभंग व्यक्त करावा हे गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर सर्व सरकारची मदार आहे. ते परिस्थिती निभावून नेण्यासाठी लढत असले तरी इतर मंत्र्यांची त्यांना पाहिजे तशी साथ मिळत नाही, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारमध्ये असूनही शिवसेनेचा विरोध, धुसफूस, कुरबुरी यामुळे भाजपा आणि फडणवीसही बेजार आहेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना चीत करण्याची वा अपमानित करण्याची, अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाही. या आघाडीवरही फडणवीस मुत्सद्दीपणा दाखवत असताना त्यांचे भाजपातील सहकारी कुंपणावर बसून मजा घेत आहेत. शिवसेनेचे मंत्री फडणवीस यांना दबून असले तरी कामगिरीत डावेच आहेत. महसूल, उद्योग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम ही तशी जनतेशी दररोज संबंध येणारी खाती. या खात्यांकडे काम घेऊन येणारे लोक, व्यावसायिक, उद्योजक यापैकी कुणीही नव्या सरकारकडून तीन वर्षांत मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फारसे समाधानी नाही.
कृषि खात्यातील अधिकारीही सरकारच्या रिव्ह्यू आदेशांमुळे असमाधानी आहेत. पाटबंधारे, जलसिंचन योजनांशी संबंधित अधिकारी, कर्मचारीवर्गही नाराज आहे. प्रकल्प जाहीर झाले पण तरतूद केली गेली नाही, पैसेच दिले गेले नाहीत तर प्रकल्प उभारले कसे जाणार? आणि आम्ही आढावा तरी कुठल्या कामांचा देणार? असे त्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या या बोलण्यावर निरुत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हीच उत्तरे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून द्यायचा निर्णय घेतला आहे, असे समजते.
अपेक्षाभंग आणि असमाधानकारक कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केल्यावर मागच्या सरकारकडे बोट दाखवण्याच्या पळकाढू वृत्तीवरही मंत्रालयातील कर्मचारीवर्ग नाराज आहे. असे किती दिवस चालणार? योजना, उपक्रमांसाठी पैसा उपलब्ध करून अपेक्षाभंगाचा डाग धुवून काढता येईल, पण त्यासाठी पैसा हवा, असे सूचक वक्तव्यही एका अधिकाऱ्याने केले.

EDIT/ या दरीचे काय करायचे?

अग्रलेख

या दरीचे काय करायचे?
गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी नेहमीच रुंदावत राहिलेली आहे. गेल्या काही वर्षांत जगभरातील विविध आर्थिक पाहाणी संस्थानी केलेल्या अहवालात ही बाब प्रकर्षाने अधोरेखित करण्यात येत असते. ही दरी अशी आहे की जी कधीच कमी होत नाही, अंतर सांधता येत नाही. श्रीमंत या टोकावर आणि गरीब त्या टोकावरच राहातात, दूर-दूर जात राहातात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या क्रेडीट सुईस ग्लोबल वेल्थ अहवालातूनही हीच बाब समोर आली आहे. जगातील एकूण संपत्तीपैकी तब्बल अर्धी संपत्ती ही केवळ १ टक्का श्रीमंत व्यक्तींकडे एकवटली असल्याचे हा अहवाल सांगतो. जागतिकीकरणाच्या रेट्यात दडपल्या जाणाऱ्या समाजघटकांचा विचार करता ते काही नवीन नाही. २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीचा जगभरातील श्रीमंतांनीच फायदा उठवला आणि जगभरातील संपत्तीतील ४२.५ टक्के असलेल्या त्यांच्या वाट्यात वृद्धी होत तो ५०.१ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक श्रीमंत असलेल्या १ टक्का लोकांकडे १०६ ट्रिलियन पाउंड म्हणजे ९०,९३,२१० अब्ज रुपये एवढी संपत्ती आहे. एका ढोबळ अंदाजानुसार ही संपत्ती अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या आठपट भरावी. जगभरातील १० टक्के श्रीमंत व्यक्ती जगातील ८७.८ टक्के संपत्ती राखून आहेत. ही आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे. २००० नंतर जगात कोट्यधीशांच्या संख्येत १७० टक्क्यांनी वाढ होत ती ३.६ कोटी इतकी झाली आहे. भारतातील लक्ष्मीपुत्रांनी जगातील कोट्यधीशांमध्ये भर घातली आहे. याच भारतीयांच्या देशात जवळपास अर्धी जनता दररोज अर्धपोटी वा एक वेळ जेवून राहात असते. महात्मा गांधींनी या गरीब वर्गासाठीच, उद्योगपतीआणि राज्यकर्ता वर्गयांनी लोकांच्या विश्वस्ताची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा ठेवली होती. तुम्ही कोट्यावधी रुपये जरूर कमवा; परंतु हा पैसा तुमचा नाही, लोकांचा आहे, हे विसरू नका. तुमच्या न्याय्य गरजांसाठी जेवढा पैसा आवश्यक आहे , तेवढा तुम्ही घ्या व उरलेला समाजासाठी खर्च करा. असेही त्यांनी म्हटले होते. त्या गांधीजींचा, त्यांच्या शिकवणीचा सगळ्यांनाच विसर पडला आहे आणि दुसऱ्याच गांधींच्या पाठी सर्व धावत आहेत. नव्या गांधींचे सर्वच भक्त आहेत. हे भारतातच नव्हे तर विकसनशील म्हणवल्या जाणाऱ्या प्रत्येक देशातील चित्र आहे. २०१४ मध्ये अशीच एक पाहाणी संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने आशिया-प्रशांत क्षेत्रात केली होती. या पाहाणीचा निष्कर्षही गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढते आहे, हाच होता. भारत, चीन आणि इंडोनेशियासह काही महत्त्वाच्या देशांत हे प्रमाण जास्त असल्याचे त्या वेळी संस्थेने म्हटले होते. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने ४० देशांत ही पाहणी केली होती. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक पाहाणीत हेच नकोसे वास्तव समोर येत आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी विषमता हे मोठे सामाजिक व आर्थिक आव्हान बनले आहे. काही घटकांच्या प्रभावामुळे समाज आणि समुदायांमध्ये ही दरी वाढते आहे, अशी त्या वेळेस नोंदवली गेलेली निरीक्षणे आजही कायमच आहेत. यावरून असे दिसते, की संपत्तीचे केंद्रीकरण हा विषमता वाढण्यातील महत्त्वाचा घटक आहे. जगातील गरीब लोकसंख्येकडे (३.५ अब्ज) केवळ २.७ टक्के एवढीच संपत्ती आहे, असे त्यावेळी आढळून आले होते. ही परिस्थिती आज अधिकच विदारक झाली आहे. जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात गरिबांना स्थान नाही. श्रीमंतांना आपल्याच समाजबांधवांमध्ये रस नाही, आपल्यासाठी कष्टणाऱ्या घटकांच्या भल्याची त्यांना पर्वा नाही. उद्योगविकासाचा मागे लागलेल्या आधुनिक भारतात तर कृषिसारख्या जुनाट क्षेत्रात धोरणतज्ज्ञांना राम वाटत नाही. त्यामुळे विकास नामक कथित गोष्ट शहरांपुरतीच मर्यादित आणि ग्रामीण भाग व शेतकरी हक्काच्या उत्पनापासून, हमी भावापासूनही वंचित अशी परिस्थिती आहे. जे जगाचे चित्र तेच भारताचेही. येथेही श्रीमंत आणि गरीब जनता यामधील दरी भयंकर वाढली आहे. आजही पाणी टंचाई, भयंकर बेकारी, दारिद्र्य, अनाचार, मागासलेला शेतीव्यवसाय या विषयांवर सरकार पुरेसे गंभीर नाही. भयानक कर्जाच्या सापळ्यात सरकार रुतत चालले आहे. ज्यांच्या हातात सत्ताकारण आहे त्यांना देश, राज्य, गरीबांचे कल्याण या गोष्टींचा जणू विसर पडला आहे. गरीबांना गरीब ठेवून श्रीमंतांनाच वेगाने अधिक श्रीमंत करणारी अब्जाधीशशाहीम्हणजे शाश्वत विकास किंवा प्रगती नव्हे. कार्ल मार्क्‍सपासून अमर्त्य सेन यांच्यापर्यंत अनेक अर्थतज्ज्ञ हेच सांगत आले आहेत. या दरीचे काय करायचे? या प्रश्नाला भिडायची वेळ आली आहे.

Tuesday, 14 November 2017

पाळेमुळे सोडवून उठून जाताना...

अग्रलेख

गावखेड्यात, तिथल्या मातीत रुजलेली आपली पाळेमुळे सोडवून आयुष्याची संध्याकाळी दुसरी वाट धरायची, जिथे जन्मलो, वाढलो तिथून उठून जायचे नाईलाजाने... कसे वाटत असेल म्हाताऱ्या जीवांना? दोन दिवसांपूर्वी आमचे स्नेही आणि ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांनी फेसबुकवरील एका पोस्टमधून हा विषय खूप आतून मांडला. त्यांच्या आईला आणायला ते गावी गेले होते. आणि त्यांना जाणवलं ते त्यांनी फेसबुकवर व्यक्त केलं. काय जाणवलं त्यांना.. वार्धक्याकडे झुकलेल्या आईची व्यथा, नाईलाजाने गाव सोडायची वेळ आल्यामुळे डोळ्यांत आलेले अश्रू आणि त्याचबरोबर त्यांच्या आईंसारख्याच अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मूक आक्रंदन. विकास महाडिक त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात – काल कोकणात गेलो होतो. आईला आणायला. 12 दिवसांपूर्वी ती गावी गेली होती. पण तिला आता कोकणात करमत नाही. कारण एकच कोकणातील घरं आता ओस पडायला लागली आहेत. अतिशय गंभीर बाब आहे. जी बाई 22 वर्षांपूर्वी हट्टाने गावी गेली. मुलांकडून घर बांधून घेतलं. तिला आता घर खायला उठतं. कारण गावात घरं आहेत पण त्यात राहायला माणसं नाहीत. सर्व सुविधा आहेत पण तिचा वापर करायला हात नाहीत. कोकणातील प्रत्येक गावात आलिशान घरे आणि मंदिरे दिसतील. पण घरांना कुलपं लटकलेली असतात. काही वर्षांपूर्वी मुंबईत आलेले चाकरमानी आता कोकणात जायला मागत नाहीत. जी गेली आहेत ती बोटावर मोजण्याइतकी. ती काय स्वमर्जीने गेलेली नाहीत. प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी ट्रॅजेडी झालीय म्हणून. कोणाची पत्नी गेली म्हणून तर कोणाची मुले सांभाळत नाहीत म्हणून. चाकरमान्यांची तिसरी-चौथी पिढी आता मुंबईत आहे. पोराबाळांच्या शिक्षणासाठी वसई, विरार, कर्जत, पनवेलला राहून दिवस काढतायेत. नोकरीसाठी पाचसहा तासांचा प्रवास करत आहेत. पण गावी जायचं नाव घेत नाहीत. गेलेच तर संध्याकाळी बेधुंद होऊन गाव फिरत राहतात. वर्षातून दोन वेळा मात्र न चुकता हा कोकणस्थ गावाकडे जातो. एक गणपती आणि दुसरी होळी. हे दोन दिवस कोकणातील 90 टक्के घरे उघडी दिसतात. ह्या दिवसात उणीदुणी आणि पार्ट्या यांना जास्त महत्व असते. घर उघडी राहणे वर्षभर होत नाही. बोलायला माणूस नाही म्हणून वय झालेली माणसं देखील इच्छा नसताना मुंबईत पळत आहेत. कोण थांबवणार ह्यांना? कोकणातील नेत्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या. कोणी शेठ झाले तर कोणी राव. पण कोकणात राहावे असे वातावरण निर्माण झाले नाही. एक चांगले हॉस्पिटल कोकणात नाही की चांगल्या रस्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मुंबईत दररोज आदळणाऱ्या लोकसंख्येच्या लोंढ्याची आपल्याला चिंता. इथे कोकण ओस पडतंय ह्याचा कोणी विचार करायचा? बघा जमतंय का विचार करून..” महाडिकांनी त्यांच्या आईच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठांच्या अंतरीची सल मांडली आहे. वर्षभर उघडी असणारी घरे आता दोनपाचच राहिली आहेत हे खरं आहे. महाडिकांचेच गाव नव्हे तर कोकणातील अनेक गावे या कुलुपबंद घरांची राखण करत असतात. गणपती, शिमग्याला कुलूप उघडले जाते, घर गजबजते, एरव्ही जळमटं धरलेल्या भिंती आनंदतात. कोकणातच कशाला राज्याच्या अनेक भागांतील गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. देशातील अनेक खेड्यापाड्यांत कमीअधिक फरकाने हीच अवस्था आहे. हे एक अस्वस्थ करणारे स्थलांतर सुरू आहे... पाळमुळं तोडून निघतायत माणसं.. न झेपणाऱ्या वयात. विकासने मांडलेले निरीक्षण अस्वस्थ करू लागले तसा त्याला फोन लावला. तो परतीच्या वाटेवरच होता. कशाला राहातील माणसं गावांत? ना रस्ते ना कुणी आजारी पडले तर त्याला योग्य उपचार मिळायला दर्जेदार वैद्यकीय सेवा.. तो तळमळीने बोलत होता. काहीतरी करायला हवे, कोकणातल्या माणसाचा पाय गावातच ठरायला हवा, असे बोलणे झाले. पण जी पिढी पोटासाठी गाव सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली आहे ती मागच्यांना कुठल्या तोंडाने गावातच राहा म्हणून सांगणार? प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे आणि जगण्यासाठी दिशा शोधण्याचा हक्क आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसं भरडली जात आहेत त्याचंच हे दृश्यरुप. कोकणातीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावांत निमूट उभी असलेली बंद घरे काय सांगतात? ती घरे सांगतात, गाव, तालुका पातळीवर रोजगाराची गरज, शेती-शेतकरी जगवण्याची गरज, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची गरज, भारताचा कणा असलेल्या कृषिव्यवस्थेशी निगडीत पूरक व्यवसाय, जोडधंदे तगवण्याची गरज. चांगल्या रस्त्यांची गरज. कारण रस्ते चांगले तर विकासवाटा या रस्त्यांवरून गावांत पोहोचतील आणि गावे जगतील नव्हे पुन्हा एकदा जागतील.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...